Showing posts with label Manus harvat chalalay. Show all posts
Showing posts with label Manus harvat chalalay. Show all posts

Sunday, October 26, 2025

Manus harvat chalalay

 


  माणूस हरवत चाललाय


सुगीचे दिवस आलेत की माझ्या बापाची 

एकच धांदल असायची

मठ, मुग ज्वारी बाजरी याचे खळे लावायचे. 

बाजरीची सुडी,मठाची गंजी घालून व्यवस्थित 

शेकारायचे,

ह्या आवकळी पावसाच्या धाकाण.


मायचं मात्र मधीच टूमण असायचं 

चार दिवसांवर दिवाळी आली..., 

विना गोड धोडाची दिवाळी 

चटणी भाकरीवर निघायची

आख्खी दिवाळी हंगाम आवरण्यात जायची

पण, 

तरी सुध्दा त्या दिवाळीत मज्जा असायची 

गोड धोड नसलं म्हणून काय झालं

गोड माणसं मात्र सोबत राहायची.

काका काकू आत्या मामा अन् सारी भावंडं 

यांनी घर कसं भरून जायचं 

शरिरान वेगळे तरी मनानं एक रहायचं 


आता मात्र तसं काही उरलं नाही.  

एका घराची दोन दारं झाली

कामा धंद्याच्या निमित्तानं 

माणसं शहराकडे गेली.

आता दिवाळीला एकत्र येत नाही. 

आलेच तर दोन दिवसाच्या वर राहत नाही.

राहिलीच तर एफडी, भिसी, फ्लॅट आणि कार

याचंच तुणतुणं चालतं फार


माया, ममता हरवत होती

आपुलकीनं विचारपूस नव्हती 


अवकाळी पावसाच्या धाकान बाप गंजी, सूडी 

झाकायचा. 


पण, आता काय? 

इथं आपलेपणाचाच दुष्काळ पडत चाललाय. 

माणूस जिता असून हरवत चाललाय

बापाच्या मनातली

ती सुगी, ती गंजी काही केल्या जात नाही.

जीव तीळ तीळ तुटल्या वाचून राहत नाही


पण त्याला कुठ माहीत..

की,

या सिमेंटच्या जंगलात माणसं झालीत परकी 

आता आपल्याजवळ फक्त ती आठवण 

डोळ्यांची खासड झाल्या सारखी.



📚🖋️ राहुल मोरे 

      ९४२१६१२९७९

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...